पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान घेण्यात येणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली आहे.
पालघर जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ७० हजार ५५४ वैयक्तिक शौचालये बांधून झाली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या मुलांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी स्वच्छता मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन प्रश्न लिखित स्वरूपात दिले जातील. या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान करायचे आहे. या स्वच्छता मतदान अभियानात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले दोन लाख विद्यार्थी स्वच्छतेविषयी आपला अभिप्राय देणार आहेत. या नावीन्यपूर्ण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग) श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांनी वक्त केली.